Book Name | परिवर्तनाचा वाटसरू |
---|---|
Author | संपादक: अभय कांता, प्रज्ञा दया पवार |
Publish Date | 07:31 pm, 05-Aug 21 |
Category | Social |
स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य चळवळीचा वारसा व संविधानातील मूल्यांचा आदर्शवाद स्विकारणारी राष्ट्रकल्पना विकास पावली. आधुनिक राष्ट्रनिर्मितीचा ध्येयवाद बाळगणारी ती राष्ट्रकल्पना जनसामान्यांनी दीर्घकाळ उचलून धरली होती. पुढे देशांतर्गत अंतर्विरोध वाढत गेले, भ्रष्ट राजकारण्यांची सद्दी वाढत गेली आणि तो ध्येयवाद ओसरत गेला. त्या पोकळीत आर. एस. एस. प्रणीत सनातनी हिंदुत्ववादी राष्ट्र कल्पना जनसामान्यांमध्ये धर्मांध-जमातवादाचे विष कालवण्यास यशस्वी ठरली.
स्वातंत्र्य चळवळीचा कसलाही वारसा नसलेल्या, संविधानातील मूल्ये आणि आदर्शाचा अव्हेर करणाऱ्या, आर. एस. एस. च्या हिंसक-मानवद्रोही राष्ट्रकल्पनेचा सामना करणे हे आजचे मोठे आव्हान आहे. आज देशाला भारतीय संविधानातील मूल्यांचे रक्षण करणाऱ्या लोकशाहीवादी-विधायक-मानवतावादी स्वरूपाच्या राष्ट्रकल्पनेची गरज आहे. कोरोना महामारीच्या आपत्तीकाळाचा अनुभव विचारात घेता, आज जनसामान्यांच्या मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीस प्राधान्य देणाऱ्या राष्ट्रवादाच्या संकल्पनात्मक पुनर्माडणीची गरज निर्माण झालेली आहे. शोषणमुक्त समताधिष्ठित समाजनिर्मितीचा ध्येयवाद बाळगणारी राष्ट्रकल्पनाच आपल्या देशाला आणि आपल्या लोकशाहीला सुरक्षित करू शकेल. त्यासाठी तद्रुरूप सार्वजनिक विवेक घडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आव्हान खडतर वाटत असले तरी दीर्घकालीन प्रयत्न आणि अमर्याद त्यागाची तयारी असेल तर ते मुळीच असाध्य नाही!.….. (संपादकीय)